top of page
श्रीगुरुदेव प्राणसखा श्रीकृष्ण 

" तोचि सद्‌गुरु प्राणेश्वर ।

श्रीकृष्णनामें सुंदर ।

गोपाळांचा जो आधार ।

भक्तवत्सल ।। "

 

— पू. बाबा 

tattly_peacock_feather_berkley_illustration_00_730x_2x.png_v=1575213092.png
tattly_peacock_feather_berkley_illustrat
IMG_0196.jpeg

श्रीसंत बाबा महाराज आर्वीकर हे आधुनिक काळातील एक महान नाथसंप्रदायीन कृष्णभक्त होते. उमेदीच्या तारुण्यात आर्वीहून निघालेला हा महात्मा, वृंदावनाच्या प्रेमभूमीत आल्यावर कृष्णभक्तीने वेडापिसा झाला होता. यमुनेच्या जललहरीतून आणि वृंदावनाच्या गल्लीगल्लीतून श्रीकृष्णाच्या मुरलीचा मंजुळ नाद ऐकून त्यांना बेहोष करून टाकले होते. प्रेमभक्तीच्या सहस्र धारांनी पू. बाबांचे जीवन न्हाऊन निघाले या प्रेमभूमीत !​

“ दाखवा ना शाम माझा, त्याविणा जगी मी भिकारी । सोसवेना विरह जीवना, दैवदैना ही विषारी ।।”

— पू. बाबा

 

असे कृष्णप्रेमाने ओथंबलेले हृदय घेऊन ते वृंदावनात भक्तीच्या मस्तीत कितीतरी काळ विहरले ! पू. बाबांनी त्यांच्या वृंदावन प्रवासकाळी केलेले वर्णन त्यांच्या शब्दात पहा: 

“ वृंदावन नाथाच्या दर्शनाला निघालो. चित्त स्थिर, नजर गंभीर व मन अधीर होते. वाटेने कुठे चाललो, कुठे जायचे काही काही कळेना. निर्बुद्ध अवस्थेत भिजलेल्या डोळ्यांनी त्याचे स्मरण ध्यान करीत चाललो. आता काय, न कुठे जाणे न कुठे येणे, न कुणी परिचीत की न कुणी प्रेमाचा. एक तो आणि मी दोघेच. अखिल नभोमंडळात सुमंगल नवप्रभात श्री घनःशामाला जागवीत होती तर माझे अंतरंगांत प्रेमाची पहाट शीतल मंद सुगंधी स्मृती पवनाचे झोतांनी विरह व्यथाग्नीला हळूहळू प्रज्वलीत करीत होती. मनाचे लगाम बेलगाम होऊन भरधाव मन अश्व पळू लागले. डोळ्यांच्या आतून अश्व दूरवर अश्वस्वार आपल्या प्रियतमाला चहूकडे न्याहाळू लागला. मनमोहन ललित लाडिला श्यामसुंदर गोपीकुंजाच्यासह लता कुंजात खेळला, नाचला. त्याच नगरीतील लताकुंजाचा नवेला मला तितकाच नवा होता की जितका प्रेमीला प्रेमाचे अंगण नित्य नवे असते. नयनमोहन लीलामयी नटवर नटवरलालाचे क्रिडांगण जवळ जवळ येत होते. त्या पहा रस्त्याच्या कडेला शामशिखरांवर छत्र धरणाऱ्या तरुलता उंच उंच कदंबाचे पसरलेल्या भुजा व्याकूळ होऊन श्रीधराला अलिंगन द्यायला जागीच तळमळत आहेत. गोपाळांचे करुणानेत्र राधारमण मुकुंदाला ज्योतीच्या कमल परागांनी सुशोभित करण्याकरिता अधीर दिसत आहेत. ह्यांच्या मानससरोवरात उगवलेल्या प्रीतीच्या नीलकमलाला रात्रीच तोडून पूजनाच्या साहित्यानी ते सर्व गिरीधारी नंदकुवराची प्रतिक्षा करीत आहेत. पुष्पलतांचे झोक नूतन पुष्पपरिमळांनी नटून सजून शामदर्शनाची गर्दी करताना दिसत आहेत. आकाशातील खग भराऱ्या मारुन मंगलस्वरुप आनंददायी देवकी सुताचा माग काढीत आहेत व चाहूल येताच तोच आला आहे असे समजून सारे रान हर्षध्वनींनी भरुन टाकले आहे. पहा या डोंगरकपाऱ्या योग साधून वियोग झालेल्या मधुसूदनाची प्रकाशमयी प्रेमसाधना करण्यात कसे गुंगून गेले आहेत. त्या पहा गोपांगना डोईवर घट नि मुखाने गोपालकृष्णाचा जयोनाद करीत त्या मृगनयनी मृगींनी विरह दावाग्नीला सहन होईना म्हणून कशाबशा झाल्या दिसतात. डोळ्यात प्रतिक्षा, मनात व्याकुळता, वदनी म्लानता व चालण्यात मंदता सहजच प्रेमाच्या धावत पाऊली येत होती. गोपाल सख्यांचे दर्शनावाचून सारे विश्व कसे अधीर, अस्थिर, व्याकूळ होऊन तळमळत आहेसे दिसते. आहे खरे, तरच तर प्रेम होईल ना ते? प्रेमाचा अंत नित्य प्रेमात होईल. त्याला ना तूट, ना पूर्णता, ना क्षीणता, ना भेसूरता, ना विद्रुपता. सदा प्रफुल्लीत कमलिनीची कळी. किती दिनवाण्या बसल्या आहेत त्या गाई. डोळ्यात केवळ प्रेमाची तार व हरिमिलनाची तीव्र लालसा झळकत होती. डोळे हेच त्यांच्या विरह प्रश्वासाचे साधन होते जणू! विरह नेत्रांनीच त्या अश्रु विमोचन करीत गोठणी बसल्या आहेत. अहाहा! मोहना ! काय जादू केलीस या जीवावर. माधवा ! काय मोहनी घातलीस या इवल्या इवल्या जीवांवर ? सारे जग जादूचे मधुकराच्या प्रेमानी भारलेले दिसत होते. मन पूर्व स्मृतीत दंग होऊन रडू लागले.” 

सद्गुरु माउली ज्ञानाई

माचणूरला पू. बाबा ज्ञानदेवांच्या गुरुप्रेमातच जोजवले आणि कृष्णसख्याच्या अपरंपार प्रेमभक्तीत बुडून गेले ! ज्या विशाल, आकाशव्यापी प्रेमाची त्यांना तिथे अनुभूती आली ती त्यांनी अगदी सशास्त्र शैलीने मागीलांसाठी साहित्यात नमूद करून ठेवली. कृष्णप्रेमाने ओतप्रोत भरलेले ज्ञानेशांचे आगळे भक्तितत्त्व पू. बाबांनी विस्ताराने विवेचिले आहे.​

 

" ज्ञानदेव म्हणजे आकाशाचे पोटींची ममता. जगांतील प्रेमाची खळखळणारी सरिता. शोकग्रस्त जीवांची हृदयाल्हादिनी प्रेमग्रंथी यच्चयावत् जीवांच्या जीवपणाचा एकत्र आलेला साहंकार म्हणजे ज्ञानदेव !


माउली शब्दही त्यांच्या पुढ्यांत ममतेची आशा करून झोंपला. विश्वजननीचा गौरव तिच्या दयेनेंच होतो, पण माझ्या ज्ञानाईचा गौरव सूर्याचे अनंत किरणांनी केला, तरी होणें कठीण ! "

— पू. बाबा

c426da1c-4e60-4a07-9ab5-c13e4f955efa.heic

पू. बाबा अधूनमधून आळंदीस जात असत. एकदा असाच त्यांचा मुक्काम तेथे होता व त्यांच्या बरोबर माचणूरची काही साधक मंडळी होती. त्याच सुमारास एक अमेरिकन, जो तेथील वैज्ञानिक व भौतिक जीवनाला कंटाळला होता, संन्याशाप्रमाणे क्षौर करून भगवी वस्त्रे घालून भारतात आला. मुंबईत त्याला कोणी तरी संत ज्ञानेश्वरांविषयी बरीच माहिती सांगितली व तो त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यास उत्सुक झाला. तो पुण्यात दोन दिवस राहिला होता. तेथेही त्याने ज्ञानेश्वरांबद्दल काही जणांना विचारले. शेवटी तो आळंदीत दाखल झाला. पुणे मुक्कामी त्याला कोणी तरी सांगीतले की तेथे नुकतेच बाबामहाराज आले आहेत व ते ज्ञानेश्वरांविषयी सर्व सविस्तर माहिती सांगतील.

तो येताच पू. बाबा उठून सामोरे गेले व थोडावेळ त्यांचा वार्तालाप झाला. त्या अमेरिकन गृहस्थाने आपली जिज्ञासा प्रकट केली. पू बाबांना संत ज्ञानेश्वरांबद्दल काही माहिती सांगण्याची विनंति केली. बाबांनी त्याला सांगितले की तू व मी आज दोघेही ज्ञानेश्वरांसमोर आहोत. तू आठ-दहा दिवस येथे रहा व अनुष्ठान कर म्हणजे स्वतः ज्ञानेश्वरच तुला त्यांची माहिती देतील असे सांगून बाबा मुंबईस जावयास निघाले. त्या अमेरिकन गृहस्थांस तेथील पत्ताही दिला. हा अमेरिकन साधना करू लागला पण १० दिवसांनीही त्याला ज्ञानेश्वर कळले नाहीत म्हणून तो मुंबईस बाबांचे मुक्कामी आला. घंटा वाजवतांच बाबा सामोरे गेले. तेव्हा त्या अमेरिकेन व्यक्तीने प्रथम बाबा पाहिले व नंतर त्याच बाबांना ज्ञानेश्वरांचे रूपांत पाहिले. असे संभ्रमित अवस्थेत ३-४ वेळा पाहिल्यानंतर धाय मोकलून रडू लागला, तेव्हा बाबांनी त्याचे सांत्वन केले व रडण्याचे कारण विचारले तेव्हा तो गहिवरल्या आवाजात नम्रपणे म्हणाला तुम्हीच ज्ञानेश्वर असतांना मला का चाळवतां. मला द्या तुमची सर्व माहिती. बाबांनी ज्ञानेश्वरांचा उदात्त इतिहास, कार्य व ज्ञानेश्वरीचा उदात्त ठेवा याविषयी त्याला सविस्तर सांगितले.

पू. बाबांचा दिव्यामृतधारा  हा अनमोल ग्रंथ ही ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावरील प्रतिपद-टीका आहे. ज्ञानेश्वरी  ही श्रीमद्भगवद् गीतेवरील प्रतिपद-टीका; तर दिव्यामृतधारा  ही 'ज्ञानेश्वरी-अध्याय बारा' वरील प्रतिपद-टीका होय ! ज्ञानेश्वरीवरील प्रतिपद-टीका अशी ही पहिलीच ! किंबहुना ज्ञानेश्वरीवर प्रतिपद-टीका करावी, अशी टीका करणे आवश्यक आहे, असे या आधी कोणालाही जाणवले नव्हते. नंतरही आजवर अशी दुसरी टीका झालेली नाही. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक पद हे सार्थ, सहेतुक, स्वतःच निश्चित प्रयोजन व कार्य घेऊन आलेले आहे आणि हे आपले कार्य ते निश्चितपणे बजावणारे आहे, असे आत्मविश्वासाने कोणी सांगू लागले, तर ते खरे वाटणे, प्रथमदर्शनी तरी, शक्य होत नाही. दिव्यामृतधारा  या ग्रंथातील प्रतिपद भाष्य वाचले की, मग मात्र हे पटते.


या ग्रंथात पू. बाबा लिहितात, “आधीच गीतामृत हेच दिव्य संजीवन, त्याहून ज्ञानेश्वरी हे संजीवनाचे रसायन आहे. गीतेने संस्कृताच्या दरडीतून तज्ञांचा गाववेशीला स्पर्श केला. पण ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्राच्या वाळलेल्या माळरानातूनही वाहू लागली व तेथे तिने हिरवे नंदनवन उभारले. सकलांच्या अभेद निष्ठेचा शीतल चंद्रप्रकाश त्यातील भक्तिचंद्रम्याने प्रसृजित केला. सारे जग अधिकाराच्या समान पातळीवर चढविले, हेच ज्ञानेशवैशिष्ट्य आहे. भगवान ज्ञानेशांच्या वैभवी भक्तिध्वजाचा गौरव करण्याचे भाग्य मला लाभले.”

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page