श्री स्वामी समर्थ
"अनंत कोटी ब्रह्मांडनायक" ही उपाधी श्री अक्कलकोट स्वामींना लाभलेली आहे. ज्यांची सत्ता काळाच्या पलीकडे, अवकाशाच्या पलीकडे पोहोचते, ते प्रत्येक जीवाशी संबंधित असतात. मग पूज्य बाबा महाराजांशी त्यांचा संबंध असणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. मात्र, हे नाते कधी आणि कसे प्रकट झाले, याचा वेध घेणे मनोहर ठरेल.
बाबा महाराज आणि स्वामी यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. इतके की, स्वामींचे अस्तित्व जणू स्वतः बाबामहाराजांमध्ये प्रकट होत असे. अशा कित्येक आठवणी आजही भक्तांच्या ओठांवर आहेत.


संत मायबाई
पू. बाबामहाराजांचा जन्म वर्धा जिल्हयातील आर्वी या गावी श्रावण शु. १४ शके १८४७ (३ ऑगस्ट १९२५) या शुभदिनी झाला. आर्वी हे गांव संत मायबाई या पुण्यशील स्त्रीरत्नाने दोनशे वर्षापूर्वीच भगवान ज्ञानदेवांच्या उज्ज्वल ज्ञानप्रकाशाने उजळून टाकले होते. ज्ञानदेवांच्या समाधीतून गुरुमंत्र प्राप्त झालेले श्री हैबतीनाथ यांचाच कृपाप्रसाद संत मायबाईना मिळाला होता.
श्रीसमर्थ रामदासस्वामी
काही विलक्षण आठवणी पू. बाबा व श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या आत्मीय बंधनाचे पुरावे देतात.
एका शिष्याने सांगितलेली सज्जनगडावरील एक घटना अशी:
पू. बाबा म्हणाले,
"किती पावन आहे नाही ही भूमी! येथील कणनकण श्रीसमर्थांच्या ब्रह्मतेजाने कसा न्हाऊन निघाला आहे! चला स्नानाला जाऊ."
असे म्हणतच ते उठले. सोबत मी, आणखी एक सज्जनगडावर उपासनेसाठी राहिलेले त्यागी, सत्वशील साधक होतो. पू. बाबा तळ्याकडे निघाले. अंगावरचे कपडे काढले व अक्षरशः त्या भूमीत ते लोळू लागले.


तुकडोजी महाराज
पू. बाबामहाराजांच्या शालेय शिक्षणाच्या काळांत आर्वीत श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमहंस दशेत वावरत असत.
पू. बाबांच्या वडिलांचा श्रीमन्महा तुकडोजींशी स्नेह जडला. स्नेह समृद्ध झाला. महाराज कधीकधी त्यांच्या गृही राहात व जात-येत. पू. बाबांना त्या पवित्र पुरुषाने आकृष्ट केले. पू. बाबांनी एकदा त्यांचे खंजरी भजन ऐकले. तेव्हा पू. बाबांचे वय दहा वर्षाचे असेल.
श्री गुळवणी महाराज
पू. बाबांच्या निर्वाणकाळाआधी त्यांचे समकालीन संत पू. गुळवणी महाराज व त्यांची सोलापूरला भेट झाली. परंतु पूर्ण वेळ दोघांमधे नजरेनेच संवाद झाला. नंतर काही शिष्यांनी गुळवणी महाराज यांना विचारले की आमचे बाबा यातून बरे होतील का? पू. गुळवणी महाराज म्हणाले की दत्तगुरूंनी पू. बाबांवर फार मोठी कामगिरी सोपविली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे, कोणी कितीहि थांबण्यासाठी अट्टाहास केला तरी ते थांबणार नाहीत.

पू. गुरुदेव रानडे
पू. बाबा दोन वेळा पू. गुरुदेव रानडे यांचेकडे गेले. प्रथम भेटीत निंबाळला पू. बाबांचे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायावर 'विश्वरूप दर्शनावर' प्रवचन झाले. याप्रसंगी पू. रानडे यांनी पू. बाबांना कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर वास्तव्य करावे असे विनविले. पू. बाबांनी उत्तर दिले "काय परमेश्वराची इच्छा असेल तसे होईल ! मी काय ठरविणार !"
