दुःख-कारण निवृत्ती
- shashwatsangati
- Jun 4
- 1 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर
प्रभुदया सर्वत्र पसरली आहे. त्याच्या दयेत जो राहतो त्याला आनंदच आहे. आपण त्या देवाचे जेव्हा ऐकत नाही तेव्हा व्याधिरूपी दानव आपल्याला छळतात. आपल्याच अंतरात्म्याचा शुद्ध संकेत ऐकावा. देवाची इच्छा आपली सर्व मुले आनंदात असावी अशीच आहे. कारण तो स्वतः आनंदरूप आहे. मग आम्हाला दुःख का व्हावे? याला कारण आहे आमचे मन व आम्ही. विकाररूपी दानव आम्हाला मोह निर्माण करतात व आमचा नाश ज्या कर्माने होतो असे देवाचे सांगणे आहे ते न ऐकता, ह्या दानवांच्या गोड आमिषांची भुरळ पडून आम्ही जगतो व शेवटी संकटे व व्याधीने जर्जर होतो. तथापि देव म्हणतो की माझ्या लेकरांनो संकटकाळी घाबरू नका. मी तुमचा पाठीराखा आहे. श्रद्धा ठेवा. मी निश्चित तुम्हाला सुख देईन. तुम्ही फक्त माझेकडे मन व दृष्टी ठेवा आणि श्रद्धेने, प्रेमाने तुमचे दुखणे बरे करण्याचे मला सांगा. तुम्ही आपली दृष्टी दुखण्याकडे ठेवू नका. जेव्हा तुम्हाला त्रास होईल तेव्हा मनोमन श्रद्धेने तुम्ही मला हाक घाला. मी 'ओ' देईन व तुमचे दुखणे तेव्हाच बरे होऊ लागेल. माझ्या पुत्रांनो तुम्ही न भिता निष्पाप मनाने वागा. न रडता श्रद्धेने जगा. मी तुमचा पोसता आहे, तसाच पोशिंदा आहे. तुमचे चांगले संकल्प माझ्याकडे येतात व वाईट संकल्प दानव तुमच्यात निर्माण करतात. तरी सावधपणे वाईट संकल्प वा विकृत कल्पना जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा निग्रहाने ते सोडा कारण त्याचेमुळे तुम्ही माझे आहात असे जगात ठरणार आहे व दानवांच्या दुष्ट जाळ्यातून, माझे तुम्ही आहात हे ठरताच सुटणार आहात. तेव्हा देवाच्या लाडक्यांनो माझ्याकडेच तुम्ही या. नित्य श्रद्धेने व प्रेमाने मला आठवा व तुमचे सुख दुःख माझेकडे लक्ष ठेवून मला सांगून विसरा म्हणजे तुम्हाला मी कायमचे माझे सुख देईन.
コメント