top of page

देवाची मूर्ति मनानेच जाणली ना?

लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

बाबांनी आपल्या भक्तांना दिलेला कृष्ण
बाबांनी आपल्या भक्तांना दिलेला कृष्ण

दगड व देव यात भेद करून दगडालाच भावाचा आकार देऊन भक्त पूजा करतात. पण भाव नसताना मानलेली मूर्ति कितीही सजवली तरी तो दगडच ना? केवळ परंपरा वा विरंगुळा म्हणून सद्रंथवाचन करणारे विपूल आहेत. पण त्या ग्रंथातील विचारांना ग्रहण करून जीवनात ते विचार अवलंबिणे व निष्ठेने तसा आचार करणे हेच ग्रंथवाचनाचे खरेखुरे फल ना? विचार वाचला पण तो ग्रहण करणाराच नाही तर तो वाचक नपुंसकच नाही का? रोज पोटभर जेवण घेऊनही ज्याचे शरीरबल वाढत नाही, तर दिवसेंदिवस जेवणारा खालावतच जातो याचा अर्थ एवढाच ना की तो जेवणारा व्याधीने ग्रस्त आहे. तो रोग दूर सारण्याचे औषध प्रथम त्याने घेतले पाहिजे. वाचन केले, मन शांत होईपावेतो वाचले पण त्या वाचनाचा उपयोगच नाही, तेव्हा काहीतरी दुसरा रोग वाचकास जडला आहे हे खरे ना? तो रोग जर बरा न झाला तर वाचन, पूजा व सत्संग यांचा उलटच परिणाम होईल ना?


मनाला लगाम देऊन, नियमित आचाराचा खुराक द्यावा. काम, क्रोध, राग, द्वेष, ईर्षा, मत्सर आदि विकृत कल्पनांना विवेकाने मोडावे व नित्य हरिचिंतन करीत सुखाने काळ घालवावा. जगात शांतवनाकरीताच फक्त बोलणे नसते तर काही उदात्त कर्मे करुन हीन कर्माचा त्याग करण्यास्तवही बोलणे असते. शांतवनाचे भाषण आपल्यास बरे वाटते. कारण त्यात आपली चूक नसल्याचे व दैवानेच सारे घडते या मताचेच विशेष असल्यामुळे ऐकणारा स्वतः आपण फार चांगले आहोत असे समजू लागतो. म्हणून पर्यायाने ती आपली स्तुतीच असते. पण उदात्त कर्मे करण्यास्तव व हीन कर्माचा त्याग करण्यास्तव जे हिताचे भाषण ते बरे वाटत नाही. कारण त्यात आपले दोष व आपला मूर्खपणाच ऐकणाऱ्याला कळून येतो. पण सूज्ञ माणसे आपले दोष लक्षात घेऊन ते दोष सांडतात व मूर्खपणाचा त्याग करुन विवेकाने उदात्त कर्मे करतात. पण अविवेकी मनूष्य वा दंभखोर मनुष्य आपल्यात दोषच नाही असे समजत असतो व त्यामूळे खऱ्याहिताचे वचनही त्याला बरे वाटत नाही तर तो त्या बोलणाऱ्या व्यक्तीला जरी ती प्रिय असले तरी तुच्छ लेखतो.


मन व जीवन एकाच रसाने गुंफावे वा भरावे. खरेखुरे भावाने देवाला भजावे. मनाप्रमाणे वाईट चांगले काहीहि घडावे असे वाटणे व न घडल्यास देवावर भार टाकणे हे उचित नव्हे. म्हणून मनाप्रमाणे विचार न करता, चांगल्या विचाराने मन घडवावे लागते व त्याकरिता देवाची करूणा भाकावी लागते. देव आपल्याला आतून बाहेरून सर्व दिशेने पहात असतो हे दृढ भावाचे ज्ञान स्थिर करावे तरच श्रद्धा टिकते व मग तो पुरुष देवाला दुःख होईल असली कर्मे मनानेही करू नये असा विचार करून वागतो.

 
 
 

Comments


Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page