मनाला कोण सावरणार?
- shashwatsangati
- Apr 23
- 2 min read
लेखक: पू. बाबामहाराज आर्वीकर

मन मारुत आहे. तो वेगवान आहे. त्याची गती अकुंठित व आकस्मिक आहे. त्याचे वाहणे बदलणारे, थांबणे उसळणारे व करणे आदळणारे असते. तो मन मारुत कल्पनेच्या खाडीतून अहंकाराच्या डोंगराला धक्के देत वाहतो. त्याचे दर्शन झाले की भावगंगेला तर शहारेच येतात. मुमुक्षु नावाच्या वाटसरूची तर तो टेहळणी करीतच फिरत असतो. तो बेमुर्वतीने तीर्थकराची जीवनवाटेवर दाणादाण करतो. विवेक, प्रेम, वैराग्य, धृति, तितिक्षा आदि अंगवस्त्रांना सावरता सावरता साधक पथिकांना हैराण करतो. त्यांची शांती नावांची आई आधीच वृद्धा ! तिला तर 'न करो भगवान' करून टाकतो. वाटसरू भेटला की त्याला हैदोस घालावासा वाटतो. कसेबसे सावरावे तर विकल्प नावाचा त्याचा प्रवाहरूप पुत्र धटिंगणासारखा आडदांडपणा करतो. समजा त्याचे पारिपत्य करायला ज्ञानखड्ग कोणी दिलेच तर त्याची कामना नांवाची स्त्री हळूच आपल्या मुलींना (वासना, इच्छा, कला) नृत्य करायची आज्ञा करते. त्यांची दासी (ईर्षा, विषया, विकृता, अमलष्की) या साऱ्या त्या पथिकाला ओढूनच नेतात. न जावे तर त्या हलगटाचे पती (उद्वेग, लोभ, मोह व दंभ) हातात प्रतिष्ठा, लौकिक, मान, अवमान या काठ्या घेऊन डोकंच फोडू म्हणतात! शेवटी पांथस्थ कासावीस होतो. या मारूतरूप मनाला सांगावे, समजवावे तर त्याचा वेग एवढा की तो क्षणाचीही उसंत घेईना व कुठे मिळेचना ! आता काय करावे ? बरे, कोणा अधिकाऱ्याला वर्दी द्यावी तर तो कर्माधिकारी कर्माचा कायदा दाखवून 'त्याचे तेच काम' असे म्हणतो. कुणा ‘वरचे सद्गामी' ज्याची गती आहे त्याच्याकडे जावे तर ते धर्मप्रमाण सांगतात. आणि 'आम्ही त्याचे काही करू शकत नाही' असे म्हणतात. हो, पण एक आहे, आपल्या हृदयात जो क्षीरशय्येवर पहुडला आहे त्याला कळले तर बंदोबस्त होतो. चला त्याला सांगू ! किती भव्य त्याचा राजवाडा ! त्यावर श्रेयसाचा कळस कसा झळकतो आहे. ते बघा यश, बळ व प्रेम त्यावरील ध्वज फहरताहेत ! धर्म व मोक्ष या खांबांवरील ती भक्ती व ज्ञान यांची दृष्ये बघा ! त्यांचे कसे छान अमृतकलश ठेवले आहेत. स्वानंद व प्रसन्नतेचे दिग्पाल व द्वारपाळ (दिव्य, साम्य, श्रीय व तेज) कसे उभे आहेत. त्यांच्या पत्नी तर नाना अलंकारांनी मंडित आस्थेतून स्वागत करायला सुसज्ज (आत्मरति, स्थिरमति, कैवल्यधृति, सृजानिति) आहेत. वा ! सारा आनंद आहे.
Comments